कृषि उत्पन्न बाजार समिती

नाशिक कषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या आवकेची

कृ.उ.बा.स. रूपरेषा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना दिनांक 21/11/1952 रोजी झाली. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात नाशिक, त्र्यंबक, पेठ असे तिन तालुक्यांचा समावेश असुन एकुण अनुक्रमे 97, 145, 124 असे एकुण 366 गावांचा समावेश आहे.

1) बाजार क्षेत्र - नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र नाशिक, पेठ व त्र्यंबकेश्वर या तीन तालुक्यांचे मिळून कार्यक्षेत्र उद्घोषित करणेत आलेले आहे. नाशिक, पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्याचा पश्चिम भाग हा मुरमाड व डोंगराळ आहे. पश्चिम भाग डोंगराळ असल्यामुळे पावसाचे प्रमाण जास्त आहे. तसेच नाशिक तालुक्याचा पुर्व भाग हा बहुतांशी बागायती क्षेत्रात मोडतो.

2) हवामान व पर्जन्य - नाशिक बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील पश्चिम भागातील तालुक्यात जास्त प्रमाणात पाऊस पडतो. पुर्व भागात थोडा कमी पाउस असतो. बाजार समितीचे कार्यक्षेत्रात थंड व उष्ण हवामान असते.

3) पिके - नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील त्र्यंबक व पेठ तालुक्यातील पश्चिम भाग डोंगराळ असुन तो आदिवासी भाग आहे. तेथे पावसाचे प्रमाण आधिक असुन त्या ठिकाणी भात, नागली, वरई, खुरासणी कडधान्य इ. पिके होतात. उन्हाळ्यात काही प्रमाणात पालेभाज्या व फळभाज्यांची पिके घेतली जातात. पुर्व भागात जमिन सुपिक व कसदार असुन त्या ठिकाणी द्राक्ष, पेरू, ऊस, कांदे, सर्वप्रकारचे फऴे, फळभाज्यां व पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते.

4) मुख्य व दुय्यम बाजार आवार - नाशिक मुख्य बाजार आवार एक व दुय्यम बाजार आवार चार असे एकुण पाच बाजार आवार आहेत. मा. ना. शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड, पेठरोड हे प्रमुख बाजार आवार व दुय्यम बाजार आवार (पंचवटी, नाशिकरोड, हरसूल, त्र्यंबकेश्वर) च्या जागा बाजार समितीच्या मालकीच्या आहेत. नाशिक प्रमुख बाजार आवारात शेतक-यांना संपुर्ण सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हरसुल येथे सबमार्केट यार्डसाठी जागा घेवून प्राथमिक सुविधा करून व्यवहार सुरू केले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे जागा घेतली असून प्राथमिक सुविधा उभारणी व गाळ्यांची उभारणी केली आहे. गिरणारे व पेठ येथे सबमार्केटसाठी जागा संपादनाची कार्यवाही चालू आहे. पेठरोड लगत 80 एकर संपादीत क्षेत्रामध्ये कांदा-बटाटा, टमाटा, अन्नधान्य, फळफळावळ मार्केट सुरू करणेत आले असुन लवकरच धान्य लिलाव सुरु करणेचा मनोदय आहे.

5) मुख्य बाजार आवार - नाशिक येथे आर. टी. ओ. आँफीस जवळ शरदचंद्रजी पवार मुख्य मार्केट असुन त्याचे क्षेत्रफळ 24 हेक्टर 30 आर आहे. तेथे कांदा-बटाटा, सर्व प्रकारची फळे, डाळींब, अन्नधान्य व टमाटा या शेतीमालाचे व्यवहार होतात. याठिकाणी 100 मे. टन क्षमतेचा भुईकाटा चालु केलेला आहे. संपुर्ण बाजार आवार सुरक्षेच्या दृष्टीने सी. सी. टीव्ही ची यंत्रणा बसविणेत आलेली असुन त्याद्वारे बाजार आवारात देखरेख ठेवली जाते.

6) पंचवटी उपबाजार आवार - पंचवटी येथे दुय्यम बाजार आवार असुन त्यांचे क्षेत्रफळ 18 एकर 14 गुंठे असून या आवारांत भाजीपाला, फळभाज्या, हिरवी मिरची, भु. शेंगा यांचे खरदी-विक्रीचे व्यवहार होतात. तसेच या आवारात दर बुधवारी जनावरांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. जनावरांसाठी पाण्याचा आहाळ, अनुज्ञप्तीधारक व्यापा-यांना पक्के स्वरूपाचे गाळे, शेतीमाल उपयागी औषधे व अवजारे यासाठी भव्य व्यापारी संकुल, सार्वजनिक सुलभ शैचालय, शेतकरी/हमाल/मापारी विश्रांतीगृह, विद्युत जनरेटर, ट्रिमिक्स पध्दतीने कॉक्रीटीकरण, 30 मे. टन क्षमतेचा भुईकाटा, दैनंदिन शेतीमालाचे भाव दर्शविण्यासाठी डिस्प्लेबोर्ड, तसेच शेतक-यांच्या हितासाठी केंद्रशासनाचे ई-नाम योजने अंतर्गत कामकाज सुरु आहे. संपुर्ण बाजार आवार सुरक्षेच्या दृष्टीने सी. सी. टीव्ही ची यंत्रणा बसविणेत आलेली असुन त्याद्वारे बाजार आवारात देखरेख ठेवली जाते.

7) दुय्यम बाजार आवार ना. रोड - या आवाराची जागा बाजार समितीची असून या आवाराचे क्षेत्रफळ 6 हेक्टर 65 आर आहे. उपबाजार सिन्नरफाटा एकलहरा रस्त्या लगत आहे. या ठिकाणी भाजीपाला डाळींब, फळभाज्या, कांदे, इ. नियंत्रित शेतीमालाचे व्यवहार चालतात.

8) दुय्यम बाजार आवार त्र्यंबकेश्वर - या बाजार आवारातील जागेचे क्षेत्रफळ 0.58.5 हेक्टर इतकी असून सद्यस्थितीत मार्केट उभारणी केलेली आहे.

9) दुय्यम बाजार आवार हरसुल - या बाजार आवाराची जागा ३.९३ हेक्टर ईतकी असुन शेतक-यांसाठी सेलहॉल असुन येथे आंबे तसेच पिक हंगामानुसार शेतमाल विक्रीचे व्यवहार होतात.

10) मुख्य बाजार आवार व दुय्यम आवार येथिल सुखसोयी - नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीने तिच्या प्रमुख आवारांत उपहारगृह, रसपानगृह, कार्यालयीन ईमारत, शेतीमाल विक्रीगृह, आवारांत वाँल कंपाऊँड, अंतर्गत पक्के रस्ते, लाईट, पाणी, बॅक, सार्वजनिक दुरध्वनी, ट्रिमिक्सपध्दतीने कॉक्रीटीकरण 30 मे. ठन क्षमतेचा भुईकाटा, दैनंदिन शेतीमालाचे भाव दर्शविण्यासाठी डिस्प्लेबोर्ड, तसेच शेतक-यांना शेतीमालाविषयी माहिती मिळणेसाठी महाराष्ट्र शासनाचे सौजन्याने बाजार माहीती केंद्र चालु करणेंत आलेले असुन सदरची माहिती फ्लॅट स्क्रिन टी. व्ही. वर दैनंदीन दाखविली जाते.या आवारात शेतीमाल विक्रीगृह बांधणेत आलेली आहे. व अंतर्गत पक्के रस्तेही तयार केले आहेत. तसेच लाईट पाणी, सार्वजनिक दुरध्वनी, सी.सी.टिव्ही कॅमेरे, सार्वजनीक शैाचालय, उपहारगृह इ. सुखसोयी पुरविणेत आलेल्या आहेत. तसेच शेतक-यांच्या हितासाठी केंद्रशासनाचे ई-नाम योजने अंतर्गत कामकाज सुरु आहे. जनावरे बाजारात जनावरांसाठी पाण्याचा आहाळ जनावरे उतरविणेसाठी धक्का इ. सोयी करणेत आलेल्या आहेत.

11) शेतीमाल बाजारभाव स्थित्यंतर - या वर्षात नाशिक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात बेताच्या पावसामुळे पावसांवर अवलंबून असलेल्या क्षेत्रात कमी वृष्टीमुळेव अवकाळी पाऊस यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे बहुतेक शेतीमालाचे भाव वाढत्या प्रमाणात होते. पालेभाज्या फळभाज्या यांची आवक मात्र बेताची होती. शेतमालाची मागणी चांगली असल्यामुळे भाव टिकून होते. या पिकांचा हंगाम साधारणत: नोव्हेंबर पासून सुरू होवून फेब्रुवारी पर्यंत चालतो. कमी पावसाचे भागात खरीपाचे पिकांचे बरेचसे नुकसान झाले आहे.

12) रब्बी हंगाम - हरभरा, मसुर, तुर, मोहरी, गहू, वाटाणा, बटाटा, जव, ही रब्बी पिके आहेत. ही पिके साधारणत: आक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात पेरणी केली जाते व मार्च ते एप्रिल महिन्यात काढणी केला जाते. या पिकांचा हंगाम मार्च ते मे पर्यंत चालतो. कमाल उलाढालीचा हंगाम मार्च ते एप्रिल पर्यंत चालतो. सदर पिकांना वातावरण मुबलक असल्या कारणाने पिके चांगली आली.

13) खरीप हंगाम - बाजरी, ज्वारी, मका, तीळ, तुर, तांदुळ, उस ह्या पिकांची पेरणी साधारणता जुन ते जुलैमध्ये पेरणी केला जाते व नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये काढली जातात. बे मोसमी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

14) बाजारभाव प्रसिध्दी - नाशिक कषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या आवकेची व बाजारभावाची दैनंदिन माहीती कृषि पणन मंडळ पुणे व ॲगमार्कनेट योजने अंतर्गत दिल्ली येथे पाठवून एम.एस.एंम.बी. या वेबसाईटवर प्रसिध्द केले जातात. तसेच महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने राबविलेल्या फ्लॅट स्क्रिन टि.व्ही. या योजनेमध्ये सर्वसामान्य शेतक-यांना तसेच बाजार घटकांना सदरचे बाजारभाव, आवक व शेतीविषयक माहीती दैनंदिन प्रसिध्द केली जाते. तसेच कृषि विभागाचे मार्गदर्शनाखाली बाजार समितीमध्ये बाजार माहीता केंद्रही चालविले जाते याचा बाजार समितीमध्ये येणा-या बरेच शेतकरी बांधवांना लाभ होतो. समितीची केंद्र शासनाचे ई-नाम योजनेअंतर्गत दुस-या ठप्प्यामध्ये निवड झाला असुन त्याप्रमाणे कामकाजासाठी प्रयत्न चालु आहेत.

पार्श्वभूमी

कृषि उत्पन्न समित्यांची स्थापना महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व नियमन) अधिनियम 1963 आणि नियम 1967 अन्वये झालेली आहे. कृषि उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार खात्याअंतर्गत कृषि पणन संचालकांची नियुक्ती केलेली आहे. विभागीय पातळीवर, जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर पणन संचालक यांना अनुक्रमे विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सहाय्य करीत असतात. त्यांना कायदयाअंतर्गत अधिकार प्रदान केलेले आहेत.

शेतमालास किफायतशीर बाजारभाव मिळवून देण्याच्या दृष्टीने बाजार आवारात सुविधा पुरविण्याचे काम बाजार समित्यांना करावे लागते. महाराष्ट्रातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांना प्रशासकीय अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने तसेच बाजार समित्यांचे व पर्यायाने शेतमालाचे नियमन करण्याचे महत्वपूर्ण कामकाज पणन संचालनालयामार्फत चालते. पणन संचालनालयामधील कृ.उ.बा.स.शाखा राज्यातील बाजार समित्यांविषयीचे कामकाज पाहाते. सदर शाखेमार्फत होणा-या कामकाजाबाबतची माहिती पुढीलप्रमाणे

कृषि उत्पन्न बाजार समिती शाखेतील कामकाज

• महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील तरतूदीनुसार संचालक मंडळास, प्रशासक/प्रशासकीय मंडळास मुदतवाढ.

• महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 52 बी नुसार अपिल.

• कृषि उत्पन्न बाजार समितीच्या स्टाफींग पॅटर्न बाबत व कर्मचारी भरती व बढती बाबत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वर्गीकरणाच्या प्रस्तावा वर निर्णय घेणे

• कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गुराच्या बाजाराचा ठेका देणे बाबतची प्रकरणे शासनास उचित निर्णयास्तव पाठविणे.

• अ वर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ अभ्यास दौ-याचे प्रस्तावांना गुणवत्तेच्या आधारे मान्यता देणे. तसेच दि.25 जुलै 2012 च्या शासन निर्णयानूसार कार्यवाही करणे.

• कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जमिनी खरेदी विक्रीच्या प्रस्तावा वर निर्णय घेणे.

• कृषि उत्पन्न बाजार समितीच्या शॉपींग सेंटर मधील गाळे,प्ल़ॉट वाटपाच्या प्रस्तावा वर निर्णय घेणे.

• शासन परिपत्रक दिनांक 14.7.2004 अन्वये राज्यातील कृउबास नी विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांना देणगी देण्यासाठी व वैद्यकीय मदत म्हणून अर्थसहाय्य करण्यासाठी बाजार समित्यांना मंजूरी देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे विहित करण्याबाबत 1 ते 18 मुद्यांबाबतची सविस्तर माहिती घेवून बाजार समित्यांचे प्रस्ताव या कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यांत येतात.

• कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाजाचे अनुषंगाने आलेल्या तक्रारींचा निपटारा करणे.

• कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाजाचे अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या मा.उच्च न्यायालयातील याचिका

• लोक सभा / राज्यसभा / विधानसभा / विधान परिषद तारांकित / अतारांकित प्रश्न , आश्वासन, लक्षवेधी सूचना, कपात सूचना

• माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्जावर कार्यवाही व त्यावरील कलम 19 (3) नुसार अपिल

• शासन/मा.मंत्री महोदय संदर्भाचा निपटारा

• मार्केटस् अँड फेअर ऍ़क्टस 1862 नुसार आठवडा बाजार भरविणे अथवा पुढे ढकलणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन आलेल्या प्रस्तावाना मान्यता देणे.

• लोकआयुक्त संदर्भाचा निपटारा

• महालेखापाल यांच्या तपासणीतील आक्षेपाची पूर्तता करणे

• धोरणात्मक निर्णयांचे अनुषंगाने परिपत्रके / पत्रे निर्गमित करणे

• मा. मंत्री महोदयांनी आयोजित केलेल्या बैठका विषयक माहिती संकलित करणे.

• महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या पुणे ...सर्व वैधानिक कामकाज

ज्वलंत विषय

• महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन )अधिनियम 1963 व नियम 1967 मध्ये सुधारणांचे प्रारुप तयार करणे.

• सचिव पॅनल संदर्भातील कायदेशीर प्रकरणे हाताळणे.

• कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका व संचालक मंडळ मुदतवाढ संदर्भातील प्रकरणे/न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.

• कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये मागासवर्गीय कर्मचारी भरती व पदोन्नती मधील अनुशेष भरणे बाबत (बाजार समित्यांची सद्यस्थीती देणे)

• कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसविणे(बाजार समित्यांची सद्यस्थीती देण)

• आडत दरा बाबतची माहिती संकलित करुन अदययावत ठेवणे.

• राज्यातील बाजार समित्यांमध्ये गाळे वाटपासंबंधी अपंग आरक्षण लागू करता येईल किंवा कसे याबाबतची माहिती संकलित करणे.

• कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये माथाडी ॲक्ट अनुषंगाने होणारी माहिती संकलित करणे.

राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांची सदयस्थिती

राज्यात 31 मार्च 2012 अखेर एकूण 302 बाजार समित्या व 603 उपबाजार आवार होते. राज्यातील बाजार समित्यांचे ' बाजार फी ' हे उत्पन्नाचे प्रमुख साधन असून प्रति रु.100/- च्या माल विक्रीवर रु.1/- बाजार फी तसेच देखरेख फी रु.100/- च्या माल विक्रीवर रु.0.05/- (5 पैसे) एवढी आकारतात. त्यातील देखरेख फी ही शासनास महसूल उत्पन्न्‍ म्हणुन अदा करण्यात येते. कापूस या शेतमालाबाबत सन 2011-12 मध्ये बाजार फी ची असणारी न्यूनतम मर्यादा काढून टाकण्यात आली होती. त्या अनुषंगाने बाजार समित्या त्यांना माफक वाटेल एवढी मार्केट फी या शेतमालावर आकारत होत्या. राज्यातील बाजार समित्यांचे उत्पन्न दरवर्षी वाढत असून त्याबाबतचा सन 2008-09 पासून सन 2011-12 पर्यंतचा माहिती दर्शक तक्ता पुढीलप्रमाणे

बाजार समितीची माहीती

बाजार समित्या स्थापन करण्यामागील शासनाचा हेतु - बाजार क्षेत्रात शेतीच्या व इतर विवक्षित उत्पन्नाच्या पणनाचे आणि त्यासाठी (राज्यात स्थापन करावयाच्या बाजाराचा, तसेच खाजगी बाजारांचा व शेतकरी ग्राहक बाजारांचा) विकास व विनिमय करणे, अशा बाजाराच्या संबंधात रचना करावयाच्या किंवा अशा बाजाराशी संबंधित असलेल्या प्रयोजनासाठी कार्य करणा-या बाजार समित्यांना अधिकार प्रदान करणे. बाजार समितीच्या प्रयोजनासाठी निधी स्थापन करणे आणि पुर्वोक्त बाबींशी संबंधित असलेल्या प्रयोजनासाठी तरतुद करणे याबाबत महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व निमियमन) अधिनियम 1963 नुसार कायदा करण्यात आला असुन त्यानुसार बाजार समितीचे कामकाज चालते.

बाजार समितीचे अधिकार आणि कर्तव्य

1. बाजार समितीने बाजार क्षेत्रात या अधिनियमान्वये केलेले नियम आणि उपविधी यांच्या तरतुदी अंमलात आणणे, बाजार क्षेत्रात कृषि उत्पन्नाच्या पणनाच्या बाबतीत (संचालक, राज्य पणन मंडळ, राज्य शासन) वेळोवेळी जे निर्देश देईल असा सुविधांची तरतुद करणे, बाजाराच्या संबंधात अधिक्षण, निर्देशन आणि नियंत्रण याबाबतीत किंवा बाजार श्रेत्रातील कोणत्याही जागी कृषि उत्पन्नाच्या पणनाच्या विनिमयनासाठी आवश्यक असतील अशी कामे करणे

2.बाजारात येणा-या लोकांच्या प्रवेशाचे वागणुकीवर देखरेख ठेवणे आणि वाहनांच्या वाहतुकीचे विनिमयन करणे.

3. लायसन्स देणे, त्याचे नुतनीकरण करणे, ते नाकारणे किंवा रद्द करणे.

4. बाजार क्षेत्रामधील बाजाराची देखभाल करणे व त्याचे व्यवस्थापन करणे व त्यासह बाजारात प्रवेश देणे व बाजारांचा वापर करण्यासंबंधात शर्ती घालणे.

5. बाजार क्षेत्रामधील बाजारात कृषि उत्पन्नाच्या पणनसाठी आवश्यक सोई सुविधा पुरविणे.

6. बाजार समितीचे असलेले अधिनियम व उपविधी मध्ये करण्यात आलेल्या तरतुदी व कार्यपध्दती यांच्या अनुसार अधिसुचित कृषि उत्पन्नाच्या लिलावांचे विनियमन करणे व पर्यवेक्षण करणे.

7. कृषि उत्पन्नाची विक्री त्याचे मोजमाप करणे, ते सुपुर्द करणे, त्यासंबंधात द्यावयाची रक्कम, खरेदी-विक्रीशी संबंधीत इतर बाबी या विहीत पध्दतीने पार पाडणे, त्यांची अंम्मलबजावणी करणे

8. कृषि उत्पन्नात भेसळ करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रतवारी व प्रमाणिकरणास चालना देणे

9. शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या किमान आधारभुत किंमतीपेक्षा कमी किंमतीत खरेदी व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे.

10. कृषि उत्पन्नाचे उत्पादन, विक्री, साठवण, त्यावर प्रक्रिया करणे, त्यांच्या किंमती, वाहतुकी संबंधीची माहिती, पिके, त्यांची आकडेवारी, बाजारवृत्त यासंबंधीची माहिती ठेवणे तिचा प्रसार करणे.

11. कृषि उत्पन्नाचे पणन आणि त्याला सहाय्यभुत अशा सर्व बाबींती संबंधीत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या संव्यवहारांमधुन उद्भवणा-या विवादांची मिटवणुक करणे.

12. आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी कोणतीही जंगम किंवा स्थावर मालमत्ता संपादन करणे तिची विल्हेवाट करणे.

13. कोणताही दावा खटला, वाद, कार्यवाही, अर्ज किंवा लवाद दाखल करणे, अथवा तडतोड करणे.

14. विहित पध्दतीने बाजार समितीच्या निवडणुका घेण्यासाठी व्यवस्था करणे.

15. बाजार समिती ज्या बाबतीत हक्कदार असेल असे आकार, फी, पट्ट्या आणि अतर रकमा किंवा पैसे आकारणे, घेणे, वसुल करणे व स्विकारणे.

16. बाजार क्षेत्रात खरेदी-विक्री विषयक सुविधा पुरविण्यासाठी संचालकांच्या मान्यतेने राज्य शासन, केंद्र शासन किंवा विविध वित्तीय संस्था यांच्याकडुन कर्ज, अर्थसहाय्य घेणे.

17. बाजार क्षेत्रात वापरात असलेले तराजु, वजनमापे आणि लायसन्सधारकांचे लेखा पुस्तके व इतर दस्तऐवज यांची पडताळणी करणे.

18. बाजार क्षेत्रात साठवण व वखारविषयक सुविधा पुरविणे.